महाराष्ट्र :
तुम्ही आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. कारण आता शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, हे करण्यासाठी शाळांना चाप लावण्याचा सरकारचा विचार आहे. पण याचा त्रास्त हा पालकांना होणार असल्याची चर्चा आहे.
बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याच समोर आले आहे. अशा गैरव्यवहार करणाऱ्या शाळांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधार कार्ड सक्ती असल्याचं आदेशात म्हटले आहे.
शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचे आधार कार्डदेखील लिंक केले जाणार आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही ‘आधार’ची सक्ती करण्यात आली आहे.
शाळा प्रवेशाबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना –
– विद्यार्थ्यांचे प्रवेश हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसोबत जोडण्यात यावेत.
– प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड बंधनकारक असणार
– शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम करेल
– विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरुन घ्यावा.
– प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी असावी. प्रवेश अर्जावर पालक आणि विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असावेत
– प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्र प्रमुखास देण्यात यावी तर दुसरी एक प्रत शाळा व्यवस्थापन समितीला द्यावा
– शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटपडताळणी पार पाडावी
– या पडताळणीत दूरुउपयोग आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात यावी
– काही कारणांमुळे पालक आधारकार्ड सादर करु शकले नाही तर अशा प्रकरणांमध्ये पालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा
दरम्यान, कोणत्याही योजना आणि उपक्रमांसाठी आधार कार्डसक्ती नसल्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने वारंवार न्यायालयासमोर स्पष्ट केली आहे. त्यामुळे ही आधार कार्डसक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. तसेच याला पालकवर्गातून तीव्र विरोधही होण्याची शक्यता आहे.
