सत्तांतरापासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदाल हल्लाबोल करत आहेत. या सर्व वार-पलटवारांदरम्यान राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकार काही महिन्यांत पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येत्या काही महिन्यांत पडणार असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
माजी राज्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अकोल्यातील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी चार मोठ्या प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्याने अडीच लाख लोकांच्या संभाव्य नोकऱ्या गमावल्याचा दावा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील शिंदे सरकार काही दिवसात पडेल असा दावा करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकीसाठी तायर राहण्याचे आदेश दिले.
आदित्य ठाकरेंनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘छोटा पप्पू’ या टिकेला प्रत्युत्तर देताना “मी छोटा पप्पू असू शकतो, परंतु जर मला तसे म्हटल्याने महाराष्ट्राची सेवा होत असेल तर आवश्य म्हणत राहू शकता.” हा छोटा पप्पू तुम्हाला महाराष्ट्रभर पळवत आहे. मी तुम्हाला धावाया भाग पाडेन कारण महाराष्ट्राला हा विश्वासघात मान्य नाही, असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री कोण आहे हे कळत नाही. फडणवसी हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान सरकार यांच्या कार्यकाळात तुलना करत आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात जेव्हापासून असंवैधानिक सरकार स्थापन झाले, तेव्हापासून शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न ऐकून घेणारे कोणी नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
