मुंबई-

    टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री  यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू झाला आहे. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत इतर चार जण प्रवास करत होते. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सायरस मिस्त्री हे मर्सिडिजने प्रवास करीत होते. पालघरजवळ सूर्या नदीवर असलेल्या चारटोली ब्रिजवर त्यांच्या मर्सिडिज कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात घडला. यात घटनास्थळीच सायरस मिस्त्री आणि आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

मर्सिडिजही वाचवू शकली नाही प्राण

   हा अपघात इतका जबरदस्त होता की मर्सिडिजचा पुढचा भाग पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. गाडीचा वेगही जोरात असण्याची शक्यता आहे. गाडीने डाव्या बाजूने डिव्हायडरला धडक दिली असल्याचे अपघातग्रस्त गाडीकडे पाहून कळते आहे. मर्सिडिजसारखी महागडी गाडी असतानाही, क्षणात घडलेल्या या दुर्घटनेत प्रसिद्ध उद्योगपतीचे प्राण वाचू शकलेले नाहीत.

रस्त्याच्या कडेलाच पडला होता मृतदेह
अपघात झाल्यानंतर काही क्षण कुणालाच काही समजले नाही. घटनास्थळीच सायरस मिस्त्री यांचा  मृत्यू झाला. त्यानंतर काही काळ सायरस मिस्त्री यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेलाच प़डून होता. रस्त्यावर जाणाऱ्या प्रवाशांनी मदत केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी गाडीतून कोण प्रवास करत होते, याची माहिती सगळ्यांना कळाली. एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा असा दुर्दैवी मृत्यू  झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ होताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा संघटनांच्या बैठकीला येण्यासाठी बीडहून निघालेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात असाच मृत्यू झाला होता. रस्त्यांवर वाढलेली वाहतूक, वाहनांची गती, शिस्तीचे आणि नियमांचे न होणारे पालन यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. अशा स्थितीत सरकारने रस्ते वाहतुकीकडे गाभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!