पुणे :
पुण्यात सध्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं सध्या घडत असलेल्या घटनांमधून समोर आला आहे. आंतरजातीय विवाह झाल्याने आणि मुलाला टिळा लावल्यामुळे पत्नीवर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन कौटुंबिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांत आंतरजातीय विवाह झाला. त्यानंतर मुस्लिम महिलांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून देखील त्रास देत असल्याचं दिसत आहे.
या सगळ्या प्रकाराला कंटाळून शेवट महिलेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी सासरच्या मंडळींंवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आणि सासऱ्यांवर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पतीला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आणि आरोपी यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. त्या दोघांना एक मुलगादेखील आहे. आरोपी मागील काही वर्षांपासून वेळोवेळी कौटुंबिक कारणावरून या महिलेला त्रास देत होता. 2014 पासून आजपर्यंत नाना पेठ, हडपसर, म्हाडा वसाहत, खडीमशीन चौक, मिठा नगर, कोंढवा या ठिकाणी घडली.
पत्नी हिंदू आणि पती मुस्लिम आहे. या दोघांना एक लहान मुलगा आहे. पत्नीने मुलाला हिंदू धर्माप्रमाणे टिळा लावला होता. या टिळ्यावरुन घरात वाद झाला. पतीने मुलाच्या कपाळावरील टिळा पुसला आणि पती चिडला. या प्रथा आमच्या घरात चालणार नाहीत असे पती आणि सासरचे मंडळी म्हणत होते आणि महिलेला त्रास देत होते. पतीने त्यांच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
कौटुंबिक हिंसाचारात वाढ . . .
मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. त्यात हत्या, वाद आणि कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाणत जास्त असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. कधी चारित्र्याच्या संशयावरुन तर कधी मुल बाळ होत नसल्याने पत्नीचा छळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुलबाळ होत नसल्याने सुनेच्या पाळीचं रक्त विकल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सासरच्यांना पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच भोंदू बाबाच्या सांगण्यावरुन पत्नीला नग्न करुन सर्वांदेखत आंघोळ करायला लावल्याची घटना घडली होती. त्यावेळी देखील आरोपी असलेल्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरणं वाढत असून यावर आळा घालण्यात यावा, असा आवाज अनेकदा उठवला गेला आहे. मात्र तरीही समाजात या घटना घडतानाच दिसत आहे.
