राज्यात काल झालेल्या अवकाळी वादळी पावसाने  मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे.  शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कालच विविध भागात अवकाळी पाऊस झाला.

काल मुंबई आणि उपनगरासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही ठिकाणी गारपीटही झालीय. मुंबईच्याही अनेक भागात काल पावसाच्या सरी आल्या. दरम्यान आज 17 मार्चलाही ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलाय. काल झालेल्या गारपीट पावसामुळे राज्याच्या अनेक भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय.

नाशिक जिल्ह्यात केसर आंब्याचे नुकसान

अवकाळी पावसाने आदिवासी भागातील आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात केसर आंब्याचं मोठं उत्पादन होतं. मात्र अवकाळी पावसाने आदिवासींच्या तोंडचा घासच हिरावला आहे. आंबरायांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मोहोर गळालाय, फळधारणेला फटका बसलाय. आणखी वादळी वारा आणि पाऊस आला तर उरलं सुरलं पीकही हातचं जाण्याचा अंदाज आहे.

नांदेड येथे वादळाचा घरांना आणि दुकांनाना तडाखा

वादळी वाऱ्यामुळे नांदेडमध्ये शेतीसोबतच घरांचे आणि टिन शेड्सच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. बारड येथील प्रसिद्ध शीतलादेवी मंदिर परिसरातील 70 ते 80 दुकाने वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त झाली. दुकानातील सर्व साहित्याचे नुकसान झाले, तर दुकानांच्या  पडझडीत अनेकजण जखमीही झाले. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांचा नांदेड जिल्ह्याला तडाखा बसलाय. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुदखेड तालुक्यात बारड परिसरात सर्वाधिक फटका बसला. काढणीला आलेली पिकं अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे आडवी झाली.

रायगडमधील आंबा बागायतदार चिंतेत

गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रायगडमधील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे फळधारणा सुरू असलेला मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून पडला. मध्यम वाढ झालेल्या फळांवर करपा आणि देठकुजव्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. यावर्षी बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते आहे.

पावसामुळे कांदा बियाणे संकटात 

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून वातावरणात मोठे बदल झाले आहेत. सततचे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे संकटात सापडले असून शेतकऱ्यांनी लावलेल्या ढेंगळ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय…तर अनेक ठिकाणी गारपिटीच्या पावसाने उभे पिक जमिनदोस्त झाल्याने याचा मोठा फटका बळीराजाला बसत आहे. दुसरीकडे कांद्याचे बाजार भाव ढासळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच आता नवीन कांदा लागवडीवरती बियाण्याचं संकट कोसळले आहे. त्यामुळे या वादळी वा-यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजा शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

पावसामुळे द्राक्ष फळबागांचं नुकसान 

सोलापुराती पंढरपूरात अवकाळी पावसामुळे द्राक्ष फळबागांचं नुकसान झाले आहे. अवकाळीने सोलापुरातील शहरी आणि ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे.  यामुळे द्राक्ष घड उन वाढेल तसे फुटण्याची भीती शेतक-यांना आहे…परदेशातही निर्यात होणाऱ्या आणि अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

अवकाळी पावसाचा फटका 56 गावांना

धुळ्यात दुस-यांदा झालेल्या अवकाळी पावसाचा फटका 56 गावांना बसलाय…
एकट्या धुळे जिल्ह्यात 861 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय… पंधराशेहून अधिक शेतकरी अवकाळीमुळे बाधित झालेत. तर .धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसानं सर्वाधीक नुकसान झाले आहे. त्यामुळे हवालदिल शेतकरी आता शासनाच्या मदतीची मागणी करत आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!