नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदमान आणि निकोबारमधील 21 मोठ्या बेटांचं नामकरण केलं आहे. विशेष म्हणजे, ही बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं ओळखली जातील. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोर्ट ब्लेअरला पोहोचले आहेत.
ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, ही 21 बेटं आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं ओळखली जाणार आहेत. येणाऱ्या पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. ही बेटं आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी चिरंतन प्रेरणास्थान असतील. यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो.
पंतप्रधान पुढे म्हणाले, अंदमानची ही भूमीत पहिल्यांदाच आकाशात मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीतून अपार वेदनांसोबत ऐकू येतात. स्वातंत्र्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. खरं तर नेताजींच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा : अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अंदमान आणि निकोबार बेटांवर तिरंगा फडकवला. यावेळी ते म्हणाले, भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज, पंतप्रधानांच्या पुढाकारानं अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या बेटांच्या नावांशी जोडून आपल्या 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या स्मृती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची प्रगती झाली आणि नेताजींनी आझाद हिंद फौजेच्या प्रयत्नानं देश स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही या भागाला देशात आणि या बेटांवर नेताजींच्या हातून सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळण्याचा मान मिळाला होता. तसेच, तिरंगा पहिल्यांदाच फडकावण्यात आला होता.
एका अधिकाऱ्यांनी बोलताना म्हटलं की, नेताजींनी 30 डिसेंबर 1943 रोजी येथील जिमखाना मैदानावर राष्ट्रध्वज फडकावला होता आणि आज त्याच ठिकाणी अमित शाह ध्वज फडकवत आहेत. या मैदानाचं नाव आता ‘नेताजी स्टेडियम’ असं ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, जिथे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यात आलं होतं, त्या सेल्युलर जेलला अमित शाह भेट देण्याची शक्यता आहे.
