मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून देशात 5G सेवेचा शुभारंभ कधी होणार याची चर्चा सुरु आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करण्यास सज्ज आहेत. त्यामुळं आज होणाऱ्या रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. रिलायन्स जिओची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. कंपनीच्या ४५ व्या एजीएमला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी या सभेदरम्यान दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सेवा सुरु करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
मुकेश अंबानी यांनी चिपसेट उत्पादक क्वालकॉम, इंटेल, सॅमसंग, मेटा, नोकिया आणि गुगलसह करार केल्याचीही घोषणा केली. तसंच गुगलसह स्वस्त 5G फोनदेखील लाँच केला जामार असल्याचं त्यांनी सांगितलं. “आज ग्राहकांची संख्या ४२.१ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. जिओचे ग्राहक दर महिन्याला सरासरी २० जीबी डेटाचा वापर करतात. हे संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. जिओ फायबर ११ लाख किलोमीटरचा परिसर कव्हर करत आहे. देशात प्रत्येक तीन पैकी दोन ग्राहक जिओ फायबरचा वापर करताय. डिसेंबर २०२३पर्यंत देशभरातील प्रत्येक शहर, तालुक्यापर्यंत जिओ 5G पोहोचणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले.
दरम्यान, रिलायन्स जिओनं स्टँड अलोन 5G सेवांचीही घोषणा केली आहे. याचाच अर्थ कंपनीला 5G सेवांसाठी 4G च्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करावा लागणार नाही. जिओने उत्तम कव्हरेज मिळावे यासाठी प्रीमिअम ७०० मेगाहर्ट्झ बँड खरेदी केला आहे. हा बँड 5G सेवांसाठी उत्तम मानला जातो.
