मुंबई
देशभरासह राज्यात रोज अनेक अपघात होत असतात. काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात. तर काही रस्त्यांवरील असुविधेमुळे होतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मृतांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आता सरकारने नियमांची कडक अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. फोर व्हिलर चालवत असताना समोरच्या सीटवर बसलेल्या लोकांना सीटबेल्ट लावणे अनिवार्य होते. हे नियम भारतीयांकडून काटेकोरपणे पाळले जात नाहीत. दरम्यान आता मागील आसनावर बसलेल्या व्यक्तींसाठी देखील सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासूनच या नियमाची अमलबजावणी केली जात आहे. नियम न पाळल्यास मोठा दंडही आकारण्यात येणार आहे. यामुळे आता वाहन चालकांना या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारकडून या नियमांविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक गाड्यांच्या मागच्या सीटवर सीटबेल्ट उपलब्ध नाही. त्यांना सीटबेल्ट बसवण्यासाठी 15 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून सर्वांना या नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. देशातील अनेक शहरांमध्ये या नियमांची कठोर अमलबजावणी सुरु झाली आहे. यानंतर आता मुंबईत देखील याविषयी कठोर नियम करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांकडून दंड देखील वसूल केला जाणार आहे. 2019 च्या मोटार वाहन कायदा कलम 194 (ब) अंतर्गत फोर व्हिलरमधील चालक आणि इतर प्रवाशांना सीटबेल्ट न लावल्या दंड भरावा लागेल अशी तरतूद करण्यात आली आहे.
मागच्या महिन्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी सीटबेल्ट लावलेले नसल्याने त्यांच्या गाडीची एअरबॅग उघडली नव्हती. यानंतरपासून सरकारकडून कठोर नियम केले जात आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तेव्हापासून कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी देशभरातील कार चालकांना सीटबेल्ट घालणे बंधनकारक केले आहे. यासोबतच आता मागील सीटवर देखील एअरबॅग्ज लावल्या जाव्यात असा नियम कार उत्पादकांसाठी करण्यात आला आहे.
